''धर्मविद्येची बदलती पात्रे''- प्राचार्य शिवाजीराव भोसले

विवेकानंदांना कांही धर्मनिष्ठांनी विचारले : ''तुम्ही धर्म आणि संस्कृती याचे अभिमानी! असे असताना तुमची सगळी भाषणे तुम्ही इंग्लिशमधून केलीत ती कशी? तुम्ही संस्कृतमधून बोलला असता तर प्राचीन पांडित्याची परंपरा अधिक संपन्न झाली असती.

या प्रश्ानचे साधे सरळ उत्तर असे होते : इंग्लिश ही जगाने स्वीकारलेली आंतरराष्ट्रीय बोधभाषा आहे. संस्कृत ही भारतातील सर्वश्रेष्ठ भाषा असूनही ती लोकभाषा होऊ शकली नाही. येथून पुढे जे विचारमंथन, विवरण व प्रतिपादन घडेल ते इंग्लिशमधून घडेल. आजची जी ज्ञानपीठे आहेत ती काशी, कांची किंवा उज्जैन येथे नाहीत. शिकागो, न्यूयार्क, लंडन, हार्वड, केंब्रिज ही 'विद्यावैभव स्थाने' झाली आहेत. संस्कृतचे आदर्श अभ्यासक हेसुद्धा परदेशात भेटू लागले आहेत.

ज्ञानेश्वर, भगवान बुद्ध, भगवान महावीर यांनीही संस्कृतचा अट्टाहास बाळगला नाही. किंबहुना लोकांच्या आकलनकक्षेत जी विस्तारत राहील तीच खरी अनुरूप ज्ञानभाग होय.

भारतीय तत्त्वज्ञान जगाला समजावून देणारे अलीकडचे भारतीय विद्वान आणि विचारवंत हे इंग्लिशचे जाणकार होते. काँग्रेसचे प्रारंभकाळातले प्रथम श्रेणीचे नेते हे इंग्लिश भाषेचे जाणते अभ्यासक होते. गांधी, नेहरू, टागोर, विवेकानंद हे इंग्लिश भाषेतून लिहू शकले. डॉ. राधाकृष्णन्, डॉ. दासगुप्ता, एम्. एन्. रॉय यांची व्यासंगधारा इंग्लिश भाषेच्या पात्रातून वहात राहिली.

स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव टागोर यांनी बंगालीतूनही लेखन केले; पण ते त्या रूपात जगापर्यंत पोहोचले नाही. गीतांजलीने जेव्हा इंग्लिश वस्त्रे परिधान केली, तेव्हा ती नोबेल पारितोषिकासाठी विचारात घेतली गेली. ही सर्व कालसापेक्षता विचारात घेतली नाही तर व्यवहारशून्यता पदरी पडेल हे उघड आहे.

स्वामीजींनी आपल्या कांही पत्रांतून आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यांची पत्रे ही बोलकी भावचित्रे होत. आलालिंग पेरूमल या आपल्या निष्ठावंत मदासी मित्रास स्वामीजींनी एका पत्रातून आपली आकांक्षा समजावून दिली ती अशी : ''प्राचीन विद्येतील गहनता आणि योगविद्येतील गूढता दूर झाली पाहिजे. मुलांना वेड लावणाऱ्या फुलपाखराप्रमाणे ती आकर्षक आणि मनोवेधक झाली पाहिजे. पुराणांचा पसारा आवरला पाहिजे. न सुटणाऱ्या गाठींचे भेंडोळे म्हणजे वेदान्त ही एक प्रकारची अवकळा आहे. धर्माला ग्लानी येणे म्हणजे धर्मतत्त्वांच्या होय.''

स्वामीजी म्हणत वेदान्ताच्या दुंदुभी चौकाचौकात वाजल्या पाहिजेत.

धर्म आणि वेदान्त यावर क्रियाशून्यतेचे शेवाळ साठल्यामुळे आपले निर्मळ प्रवाहीपण गमावून बसलेल्या त्या कालबाह्य विचारधारा झाल्या आहेत.

परदेशगमन करणारे, प्रसंगी परभाषेतून प्रतिपादन करण्याची उभारी असणारे विज्ञाननिष्ठ धर्मदूत ही आपली गरज आहे.

गीताकार गोपालकृष्ण हा गोपालन करणारा, गोपाळांच्या संगतीत राहणारा, सांदिपनी ऋषीकडून संस्कृतची संथा घेणारा, यमुनेच्या डोहात डुंबणारा, गोरगरीबाच्या शिदोरीचे एकत्रीकरण करून त्याला ''गोपाळकाला'' हे नाव देऊन तो गोपाळांना वाटणारा, स्वत: समतेचे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जगत होता.

वर्ण हा शब्द सामाजिक भूमिकेचा वाचक आहे. जेवढ्या प्रकारची कामे तेवढ्या प्रकारचे वर्ण अस्तित्वात आले पाहिजेत. प्रचलित जातीव्यवस्था मोडीत काढण्याचे बळ धर्मात असावे. उद्याचे जग हे श्रमिकांचे होईल अशी चिन्हे दिसत आहेत. विज्ञाननिष्ठ श्रमिक हेच भारताचे भावी राज्यकतेर् ठरतील.

- ( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले