विवेकानंद रामकृष्णांकडे जाऊ लागले. कधी साशंक मनाने तर
कधी नि:शंक वृत्तीने ते त्यांच्याशी बोलत. त्यांना देव हवा होता.
रामकृष्णांनी तो अनुभवला होता. स्वामींना समाधिसुख हवे होते. रामकृष्ण सतत
त्याच अवस्थेत असत. शेवटी रामकृष्ण हे विवेकानंदांच्या जीवनातले एकमेव
आशास्थान उरले. रामकृष्णांच्या कृपेने आपणास देवदर्शन घडेल, साक्षात्कारसुख
लाभेल असे त्यांना वाटे. काही वेळा हा आशावाद फोल वाटे. या जगात कोण कोणाला
काय देऊ शकेल? धनसंपदा देता येईल. ज्ञानही थोडेफार देता येईल; पण साक्षात
ईश्वरानुभव कोण आणि कसा देणार? ही काय देण्याघेण्याची गोष्ट आहे काय? तरी
सुमारे पाच-सहा वषेर् मोठ्या आशेने, अपेक्षेने आणि ओढीने विवेकानंद तहानभूक
विसरून रामकृष्णांकडे जात होते. जगातले सर्व साधनमार्ग ज्याने चोखाळले होते
आणि जो विश्वात्मक झाला असा एक महामानव विवेकानंदांना दिसत होता. त्याच्या
नावापुढे पदवी नव्हती. त्याच्या घरी तिजोरी नव्हती. नव्हे ज्याने उभ्या
आयुष्यात पैशाला स्पर्श केला नाही. ज्याला विषयसंग घडला नाही. ज्याने लग्न
केले आणि पत्नीला देवता मानले असा हा अद्भूत माणूस! जर वेडेच व्हावयाचे, तर
या वेड्यापायी वेडे व्हावे, असे स्वामीजींना वाटू लागले. रामकृष्णांचा हा
नरेंद अजून स्वामी व्हावयाचा होता. त्याने समचित्त होऊन मानसिक स्वामित्व
संपादन केले होते. या आत्मप्रभुत्वाच्या आरशात त्याला रामकृष्णांचे दर्शन
घडे. पुढे रामकृष्ण संघाच्या माध्यमातून ज्याचे सादरीकरण घडले ते रामकृष्ण
दर्शन विवेकानंदांच्या अंतर्यामी आकाराला येऊ लागले. त्याचे मूलभूत सिद्धांत
स्वामींनी शब्दबद्ध केले ते असे. ''डिव्हिनिटी ऑफ सोल' आणि 'युनिटी ऑफ
एक्झिस्टन्स' , 'हार्मनी ऑफ रिलिजन्स' , 'रिनन्सिएशन अँड
सव्हिर्स' .
आपल्या ठायी असणाऱ्या दिव्यत्वाचा शोध आणि बोध, इतरांच्या
ठायी येणारा त्याचा प्रत्यय, सर्वधर्मांचा परस्पर संवाद, मोहापासून मुक्ती
अथवा विरक्ती, जीवमात्राची शिवभावे सेवा : या तत्त्वांचा समुच्चय म्हणजे
रामकृष्ण धर्म!
आदर्श व्यक्ती, समाज आणि जग यांच्या संवर्धनासाठी
उपयोगी पडणारी ही आचार-विचारसूत्रे विवेकानंदांना गवसली. इतकेच नव्हे तर
त्यांचे सर्व पारमाथिर्क हट्ट रामकृष्णांनी पुरविले. त्यांना देवीचे दर्शन
घडविले. समाधीचे सुख मिळवून दिले. विवेकानंद गाभाऱ्यातील देवी मानत नव्हते.
ती एक सजलेल्या पाषाणाची आकृती असे ते समजत. पण एकदा कौटुंबिक विवंचनांनी
ग्रासलेले व अगतिकतेपोटी खिन्न आणि सुन्न झालेले विवेकानंद रामकृष्णांच्या
आज्ञेने देवीला साकडे घालण्यासाठी कालीमंदिरात गेले. देवीच्या प्रत्यक्ष
दर्शनाने आपले दु:ख विसरले. त्यांनी हात जोडून याचना केली ती विवंचना
मुक्तीची नाही. आथिर्क मदतीची नाही. 'भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य'
यांची. त्यांना देवी दिसली. केवळ भासली नाही. काश्मीरच्या क्षीरभवानी
मंदिरात, दक्षिणेकडे कन्याकुमारीच्या मंदिरात तिची भिन्न दर्शने घडली.
स्वामींनी पातंजल योग अभ्यासला होता. ते आसनस्थ होत. ध्यानधारणा
करीत; पण समाधिसुखाचा लाभ त्यांना घडत नव्हता. रामकृष्णांच्या अखेरच्या
आजारात ते जग सोडून जाण्यापूवीर्, काशीपूरच्या उद्यानात स्वामींना सुदीर्घ
समाधीसुखाचा अनुभव घेता आला. परब्रह्मा हाताशी आले, अगदी कवेत आले. पण त्याच
क्षणी रामकृष्ण म्हणाले : आता हे अनुभवाचे कपाट बंद करून त्याची किल्ली मी
माझ्या हाती ठेवतो आहे. तुला या उदात्त आणि उत्तुंग अनुभवाच्या परीघाबाहेर
राहून जीवमात्राची सेवा करावी लागेल. तुझे जगणे जगाच्या कल्याणासाठी घडावे
असा माझा हट्ट आहे. श्ाी रामकृष्ण थोड्या दिवसांत गळ्यातला कॅन्सर वाढून
वाढून हे जग सोडून गेले. जाता जाता म्हणाले : पूवीर् जो राम झाला, कृष्ण झाला
तोच मी रामकृष्ण म्हणून वावरलो. देहत्याग घडला तरी मी तुम्हा साधकांबरोबर
असेन. विवेकानंद, शारदामणी, आपले विरक्त युवाभक्त असा परिवार मागे ठेवून एका
वेगळ्याच रूपात जगात नित्य नांदण्याच्या निश्चयाने रामकृष्णांनी अखेरचा श्वास
सोडला.
या श्वासातून उभा राहिला तो रामकृष्ण-संघ. आज जगात अनेक
राष्ट्रांत आपले काम करीत तो उभा आहे. न्यूयॉर्कपासून सिंगापूरपर्यंत,
कोलकातापासून म्हैसूरपर्यंत जागोजाग त्याचे अस्तित्व जाणवते. आजन्म
ब्रह्माचर्याचा अंगिकार करणारे, अनेक वर्षांच्या पूर्वतयारीनंतर दीक्षेस
पात्र ठरलेले, इंग्लिश भाषेवर प्रभुत्व असणारे अनेक संन्यस्त तेथे आपणास
भेटतात. पुणे, मुंबई, नागपूर, बेळगाव अशा नगरात पण त्यांचे दर्शन घडते.
ज्ञानदान, समाजसेवा, मानवरूप माधवाची पूजा हेच त्यांचे कार्य! विवेकानंद
नावाचा एक निदिध्यास अशा रीतीने आजही भूतलावर अखंडितपणे नांदतो आहे.
- प्राचार्य
शिवाजीराव भोसले
(
क्रमश:)